नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील खामगाव येथे ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून दुसऱ्या बाजूनेही मारहाण व जमाव जमवून हल्ला केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील गट क्रमांक 381 मधील जागेवर करण्यात आलेले तारांचे कंपाउंड काढण्याच्या वादातून 4 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सागर चंद्रकांत घोलप (रा. खामगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गणू कोकणे, प्रसाद संतोष कोकणे व मयूर संतोष कोकणे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ग्रामस्थ, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष संदीप घोलप हे कथित अनधिकृत तारांचे कंपाउंड काढत असताना आरोपींनी विरोध केला. यावेळी प्रसाद कोकणे यांनी संदीप घोलप यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनी ग्रामस्थांना शिवीगाळ करून फिर्यादीस दगड मारून जखमी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संतोष कोकणे व मयूर कोकणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, याच घटनेप्रकरणी आशा संतोष कोकणे यांनीही जुन्नर पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, खामगाव येथील ग्रामस्थांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या पतीने केलेले तारांचे कंपाउंड तोडले. त्यास विरोध करणारा मुलगा प्रसाद याला तसेच पती संतोष व मुलगा मयूर यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून संदीप घोलप, सागर घोलप, अजिंक्य घोलप यांच्यासह 17 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास जुन्नर पोलिस ठाण्याकडून सुरू असून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.