खोडद:( प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली . आज (दि. 7 ) साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिवरे, खोडद परिसरात अचानक आलेल्या आवकाळी पावसामुळे शेतामध्ये ठेवलेल्या कांदा भिजू नये म्हणून शेतकऱ्यांना प्लास्टिक कागद टाकून झाकावा लागला . जास्त हवा असल्यामुळे कांदा झाकणे शेतकऱ्यांना अवघड जात होते. यावर्षी जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सगळी कडे कांदा काढण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. काढलेला कांदा शेतात कांद्याच्या पाथीखाली झाकून मुरायला ठेवला आहे. परंतु मंगळवारपासून आवकाळी पाऊस आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी तारांबळ उडाली आहे. ज्यांच्याकडे कांद्याच्या बराखी आहेत त्यांनी बाराखीमध्ये कांदा साठवून ठेवला आहे. व ज्या शेतकऱ्यांकडे बराखीची सोय नाही त्या शेतकऱ्यांनीही शेतामध्ये प्लास्टिकच्या कागदाखाली कांदा झाकून ठेवला आहे. कांद्याला बाजार भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. परंतु सध्या कांद्याला बाजार भाव अवघा आठ ते दहा रुपये किलो असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. कांदा लागवड व काढणी खर्च आणि सध्या मिळत असलेला बाजार भाव यामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक नियोजन कोलमडले आहे.