‘
दिल्ली -प्रतिनिधी ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “ग्रामीण वैद्यक व आरोग्यसेवा क्षेत्रातील अनुकरणीय नेतृत्वासाठीचा सीताराम जयपूरिया फाउंडेशन पुरस्कार – २०२६” डॉ. सदानंद दगडू राऊत व डॉ.सौ पल्लवी राऊत यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. राऊत दांपत्य गेली ४० वर्षे उत्तर पुणे जिल्हयाच्या ग्रामीण व आदिवासी भागात समर्पितपणे वैद्यकीय सेवा देत आहेत. ग्रामीण जनतेपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे, आरोग्यजागरूकता वाढवणे आणि वैद्यकीय सेवा अधिक परिणामकारक बनवण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. नारायणगांव येथे १९९० पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. ग्रामीण भागात प्रथमच १९९६ साली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अतिदक्षता विभाग सुरू करून हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे
विशेषतः सर्पदंश उपचार,व्यवस्थापन जनजागृती आणि डॉक्टरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे.त्यांच्या या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा घेतली असून ते सर्पदंश तज्ञ समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशा मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०३० पर्यंत ५० टक्यांनी कमी करण्याचे ठरविले आहे परंतु डॉ राऊत दांपत्याने शून्य सर्पदंश प्रकल्प सुरू केला असून आतापर्यंत १२००० पेक्षा जास्त विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान दिले आहे किडनी निकामी होण्याचे व अपंगत्वाचे प्रमाण सुद्धा कमी केले आहे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यातील डॉक्टरांना सर्पदश उपचारासंबधी प्रशिक्षण दिले आहे, वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल त्याना शिवनेरी भूषण, आरोग्यरत्न महाराष्ट्र शासन, व इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे नुकताच त्यांना दिल्ली येथे ताज मानसिंग हॉटेलमध्ये सीताराम जयपुरिया फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री सोनाली बेंद्रे, श्री अशोक जयपुरिया , सौ यामिनी जयपुरिया, डॉ हरेश महाजन, डॉ राकेश टंडन, डॉ दोराईराज प्रभाकरन,
यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराची मिळालेली ५ लक्ष रुपये सर्पदश जनजागृती व तरुण आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले त्यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.